Prawns Rice – कोळंबी भात
साहित्य – ५०० ग्रॅम कोलंबी, हळद , ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, तळलेला कांदा एक वाटी, २ तमालपत्र, ७ ते ८ लवंगा, १०-१२ काळेमिरी, एक चक्री फूल, ३ हिरव्या वेलच्या, एक मसाला वेलची आणि अर्धा चमचे जिरे, २ सुख्या लाल मिरच्या, एक उभे काप केलेलं बटाटा, एक वाटी हिरवं आणि लाल मध्यम काप केले टोमॅटो, एक वाटी मध्यम काप केलेली शिमला मिर्ची, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, २ tbl spn क्रश केलेलं आलं आणि लसूण, ३५० ग्रॅम बासमती तांदूळ, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ.
कृती – एका बाऊल मध्ये काप केलेले बटाटे घेऊन त्यात चिमूटभर हळद, अर्धा (half tbl spn)चमचा कोळी मसाला, १ tbl spn लिंबाचा रस ( लिंबाचा रस हा पर्यायी आहे ) आणि चिमूटभर मीठ टाकावे. सर्व जिन्नस चांगले मिक्स करावे. बटाटी मिक्स करून झाल्यावर त्यांना एका फ्राईंग पॅन मध्ये तळून घ्यावे. तळून झाल्यावर त्यांना बाऊल मध्ये काढून घ्यावे. आता एका पातेल्यात भाताच्या प्रमाणापेक्षा १/४ पाणी घेऊन त्यात सर्व गरम मसाला टाकावा. भातामध्ये जर आपणास मीठ हवे असेल तर अर्धा चमचा मीठ टाकू शकता. या भाताला साधारण ७०% शिजवून घावे. भात शिजून झाल्यावर त्याला एका चाळणीत टाकून गाळून घ्यावे. एका मोठ्या पातेल्यात किंव्हा कढईत ४ चमचे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा आणि लालसर रंगापर्यंत तळून घ्यावा. कांदा तळून झाल्यावर त्यात २ tbl spn क्रश केलेले आलं लसूण टाकावं आणि तेही खरपूस भाजून घ्यावं. आलं लसूण परतून झाल्यावर त्यात एक चमचा हळद टाकावी. २ १/२ tbl spn कोळी मसाला टाकावा, मसाला तेलात चांगला परतवून घ्या. मसाला परतवून झाल्यावर त्यात एक वाटी हिरवं आणि लाल मध्यम काप केलेले टोमॅटो, एक वाटी मध्यम काप केलेली शिमला मिर्ची टाका आणि सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. आता यात कोलंबी टाका. मी येथे खाडीची कोलंबी घेतली आहे आपण या जागी मोठी कोळंबी किंव्हा कर्दी देखील वापरू शकता. नंतर यात अर्धी वाटी दही टाका. दही आणि कोलंबी मिश्रणात चांगली घोळून घ्या. मिश्रण चांगले घोळून झाल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. २ सुख्या लाल मिरच्या टाका. (सुक्या मिर्च्या पर्यायी आहेत.) सर्व मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यावे. ५ मिनिटे सर्व जिन्नस चांगले शिजू द्यावे. ५ मिनिटांनंतर यात चवीनुसार मीठ टाकावे. मीठ टाकून झाल्यावर पुन्हा एकदा मिश्रण चांगले घोळून घ्यावे. आता कोलंबीच्या मिश्रणावर आपला ७०% शिजलेला बासमती भात टाकावा, तळलेली बटाटी टाकावी, तळलेला कांदा टाकावा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. आता गॅस थोडा मध्यम ठेवून हलक्या हाताने सर्व मिश्रण मिक्स करून घ्या आणि गॅस मंद करून एक वाफ काढा. आपला कोळी पद्धतीतील चविष्ठ आणि रुचकर ‘ कोळंबी भात तयार झाला आहे. सोयीनुसार एका प्लेट मध्ये हा भात काढून घ्यावा आणि गरमागरम सर्व्ह करावा.
There are no comments